आपण नेहमी म्हणतो आमची मराठी एवढी महान आहे कि ती अमृतापेक्षाहि श्रेष्ठ आहे, पण आजकाल म्हणजे खरतरं प्रदीर्घकाळापासून मराठी घराबाहेर गेली कि कनिष्ठ होते अगदी भाजी, किराणा खरेदी करताना असो कि रिक्षा घेताना तिचा अपमान व्हायला सुरुवात होते.
दैनंदिन जीवनात आपण तिची एवढी अवहेलना करून कसकाय बर म्हणू शकतो कि माझी मराठी महान आहे?
 |
परि अमृतातेहि पैजासी जिंके पण आपल्याच घरांत-दारात हाल सोसते मराठी. |
मॉल
मध्ये, चित्रपटगृहात, उपहारगृहात तर एकेकाचा रुबाब पाहण्यासारखा असतो, दोन मराठी माणसे हिंदीत बोलण्याची हीच ती जागा असावी,
आणि हो सोबतीला राष्ट्रभाषेचा खूळ आहेच कि आपल्याच माणसाला अगदी उर- बडवून सांगावे लागते कि भारत संघराज्याला राष्ट्रभाषा नाही.
बर आपले कारणे तर बघा ना;
नेहमीचं एक कारण म्हणजे आम्हाला अमराठी व्यक्ती मराठी कसे बोलेल? आपण त्याला त्याच्या भाषेत बोलायचं त्याला काय होतंय एवढा? अस म्हणून आपण आपली भाषा दुय्यम केलीये.
आणि दुय्यमतेचं हे गणित मला सजतच नाही कि मालक त्याची स्वतःची भाषा न बोलता त्याच्या नोकराची भाषा बोलतो, नोकरची भाषा बोलणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य बहुतेक, ज्याला कामाची गरज आहे (म्हणजेच नोकर) तो आपली स्वतःची भाषा बोलतोय आणि जो रोजगार देतोय(म्हणजेच मालक) तो नोकराची भाषा बोलतोय.
कधी आत्मचिंतन केलंय ह्याचं वर्षानुवर्ष एखादा माणूस महाराष्ट्रात राहतोय पण तो मराठीत बोलत नाही व्यक्त होत नाही ह्याच कारण काय असाव? ह्याचा विचार केलाय का कधी? मी केलाय आणि म्हणूनच तो मला अपमान वाटतो माझ्या मराठीचा,
हो अमृताला पराभूत करणाऱ्या मराठीचा आणि सोबतच हा तुमचा देखील अपमान आहे, हो! तुमचाच आणि तुमच्या आई-वडिलांचा सुद्धा.
आपण मराठीला मातृभाषा म्हणतो म्हणजे आईची भाषा त्या आईच्या दुधातून जेव्हा तुम्हाला पहिला थेंब मिळाला ना? तेव्हा तुमच्या आईला आनंद देखील मराठीतचं झाला होता! त्याच मराठीची तुम्ही अवहेलना करून संपूर्ण मराठ्यांच्या आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान करताय.
का झाला ज्ञानेश्वरा तू पाया? का रचिला तुकारामा तू कळस?हे दिवस पाहण्यासाठी?
कधी विचार केलाय का? तुमच्या ह्या अश्या वागण्यामुळे संपूर्ण मराठी अर्थकारणावर वाईट परिणाम झालाय, (परिणाम काय मराठी अर्थकारण आहेच कि नाही ह्याची शंका येण्या इतपत विनाश झालाय).
मराठी मुलांना नौकरीच्या संधी निर्माण तर सोडाच ज्या संधी आहेत त्या देखील त्यांना मिळत नाहीएत. हळू-हळू आपण आपल्याच सुपीक, सुजलाम-सुफलाम महाराष्ट्रातून अल्पसंख्याक होऊ लागलोय.
ह्याच्याठीच केला होता का अट्टहास? मराठी माती मिळाली पण त्यात राहणारा मराठी माणूस कुठाय? तो चक्क हिंदीत बोलायला लागलाय त्याचे मुले नालायाकासारखे घरात-बाहेर हिंदीत बोलतायत आणि तो मराठी पालक त्याची मराठी थोडी कच्ची आहे म्हणून निलाजर्यासारखा हसतोय, किती हा मिंधे पणा?
बर तुमच्या अश्या वागण्याने उद्या तुमच्या पाल्याला रोजगार पण मिळणार नाही हे तुम्हाला हे कळत नाही का? बर तो/ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊन हिंदी का बर बोलतं असेल?
त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊन धड इंग्रजी वाचता-लिहता बोलता पण का येत नसाव?
हि असली अर्धवट डोकी कोणती क्रांती करणार आहेत क्रांती कसली उद्या मराठीची लाज बाळगली नाही म्हणजे मिळवलं? ह्यांना फक्त मेकोले च्या पद्धती नुसार सांगकामे पणे आपला उदरनिर्वाह चालवावा लागेल अस दिसतंय.
एका दिवसांकरता मराठी राजभाषा दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करून काहीच होणार नाही छत्रपतींनी आपल्या व्यवहारात मराठी रुजवली आणि हट्टाने वाढवली ती ह्याच्यासाठीच का?
त्याचं नाव घेतना एकदा तरी विचार करा कि त्यांचे नियम व वारसा आपण विसरत चाललोय महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना एकदा फक्त विचार करा मी काय करतोय मराठीसाठी.
आणि काही दिव्य करण्याची गरज नाही बर का?
घरातून बाहेर पडल्यावर जरी मराठी बोललात तरी तुमचे खूप उपकार होतील!
जय महाराष्ट्र!
डॉ. उत्तम अ. देशमुख.
Post Comment
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
धन्यवाद! मला खूप आनंद झाला की तुम्ही माझ्या ब्लॉगवर आलात आणि आपले अभिप्राय व्यक्त कले.
अशाच नवनवीन माहिती साठी वेबसाईट ला भेट द्या, तुमच्या अभिप्रायाला लवकरच उत्तर मिळेल.